Advertisement

शैक्षणिक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कन्हानमध्ये तीव्र आंदोलन


शैक्षणिक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार व विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कन्हानमध्ये तीव्र आंदोलन


सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ कँडल मार्च; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी


कन्हान : - शिक्षण व्यवस्थेतील कथित वाढता भ्रष्टाचार, स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ सोमवार (दि. २०) जुलै रोजी कन्हान-पिपरी शहरात नागरिक, विद्यार्थी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कँडल मार्च व निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.


आंदोलनाची सुरुवात तारसा रोडवरील शहीद प्रकाश देशमुख स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शहीद प्रकाश देशमुख चौक येथून निघालेला कँडल मार्च तारसा चौक, गांधी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला. हातात मेणबत्त्या आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन सहभागी नागरिकांनी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली लागू करण्याची मागणी केली.


आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, विद्यार्थी आपल्या शिक्षण, भविष्य आणि रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आवाज उठवत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर कथित बळाचा वापर होणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने समोर येणाऱ्या कथित अनियमितता व भ्रष्टाचारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून सरकार त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.


आंदोलनाच्या समारोपा वेळी रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन नायब तहसीलदार दीपक कुभरे तसेच कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांना देण्यात आले. निवेदनात शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे, विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली.


या आंदोलनात नितीन मेश्राम, अजय चव्हाण, चिराल वैध, रजनीश मेश्राम, मनोज गोंडाणे, रोहित मानवटकर, दीपक तिवाडे, संदीप शेंडे, महेश धोंगडे, नरेश चिमणकर, शांताराम जळते, राजकुमार चंदादे, संजय चंदादे, रामानंद प्रधान, सुगंध येके, विशाल होगले, प्राजक्त वानखेडे, धीरज राऊत, मयूर राठोड, भाग्यश्री पाटील, नैना वंजारी, विराट हेडाऊ, राहुल शामाटे, महेश येके, सतीश जखरे, मनीष उपराडे, विनोद, नितीन चौधरी, विशाल कठले, गप्पू पखाले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करून व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या