थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पावरील आक्षेप निकाली निघेपर्यंत सर्वेक्षण व मोजणीची कामे थांबविण्याची शेतकऱ्यांची मागणी
कन्हान : - नागपुर थर्ड आऊटर रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आक्षेपांवर निर्णय होण्यापूर्वी सुरू असलेली ड्रोन मॅपिंग, जीपीएस सर्वेक्षण, मोजणी व दगड रोवण्याची कामे तात्काळ थांबविण्याची मागणी करत रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव, गवणा, गुंढरी (वांढे ), पारडी, इटगाव, बखारी, नांदगाव, महाजनको, वाघोली, केरडी, निमखेडा, बोरी (राणी), पांजरा (रिठी ), खेडी आणि बोरी (सिंगोरी) या गावांतील सुमारे ६४३ शेतकऱ्यांच्या सुपीक शेतीजमिनी संपादित कर ण्याचे प्रस्तावित आहे. या जमिनी अनेक पिढ्यांपासुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असुन, त्यांचे अधिग्रहण झाल्यास शेतकऱ्यांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालया मार्फत नियमानुसार आपल्या हरकती व आक्षेप दाखल केल्या आहेत. मात्र एक महिन्याहुन अधिक कालावधी उलटुनही त्या आक्षेपांवर कोणताही निर्णय, सुनाव णी किंवा उत्तर देण्यात आलेले नाही. असे असतानाही प्रशासनाकडुन ड्रोन सर्वेक्षण, जीपीएस मोजणी आणि दगड रोवण्याची कामे सुरू करण्यात आल्याने शेतक ऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करित प्रकल्पाबाबत पुरेशी माहिती न देता दगड रोवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप केला आहे.
शेतकरी संघर्ष सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे की, शेतकऱ्यांच्या सर्व आक्षेपांवर कायदेशीर निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा मोजणीची कामे करण्यात येऊ नयेत. तसेच बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाची संपुर्ण माहिती, आक्षेपांवरील निर्णय व पुढील कार्यवाही पार दर्शकपणे जाहीर करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतांना सुधाकर उमाळे, राहुल वानखेडे, सारंग झाडे, ओमप्रकाश काकडे, दिपक झाडे, संतोष ठाकरे, रोशन तडस, दिपक यादव, विनायक काठोके, अशोक ठाकरे, भोजराज काकडे, सागर खंडाळ, चक्रधर ठाकरे, दिपक भोयर, प्रफुल कावळे, भिमराव काकडे, पंकज नागपुरे, कैलास ठाकरे, विजय ठाकरे, नेमदेव वैद्य, शंकर काळे, बंडुजी ठाकरे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या