कन्हानमध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप
कन्हान : - क्रांतीसूर्य बिरसा मुंडा गोंडवाना सेवा समिती, कन्हान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कन्हान-पिपरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेश बर्वे, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रशेखर पडोळे आणि पोलीस उपनिरीक्षक कृष्णा गोंगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, वीरांगना राणी दुर्गावती, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांचा दुपट्टा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तरुणांनी विविध नृत्य व सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका राखी परते यांनी प्रस्तावनेतून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासोबतच आदिवासी समाजाने आपल्या परंपरा, संस्कृती आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. आदिवासी समाजातील युवा पिढीने शिक्षण, सामाजिक कार्य आणि कला-क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मरस्कोल्हे व अखिलेश मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंचम सलामे यांनी केले.
याप्रसंगी सौ. कल्पना जाधव, नगरसेविका रेखा टोहणे, नीति तेलोटे, नीतू परते, नगरसेवक निकेश मेश्राम, राकेश लांजेवर, पवन कुंभालकर, आकाश महतो, अतुल गजभिये, ज्ञानेश्वर दारोडे, अर्जुन पात्रे, अभिजित चांदुरकर यांच्यासह समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खैलेश सलामे, संदीप परते, गगनजी सिरसम, राहुल टेकाम, शुभम उईके, बंटी टेकाम, नवल धुर्वे, नरेश धुर्वे, रोहित आरमो, बंटी उईके, शुभम सलामे यांच्यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या